राष्ट्रवादीचा गडी , भालके समर्थक विजयसिंह देशमुख भाजपच्या वळचणीला..!
------------------------------------------------------------------------------------
पंढरपुरात राष्ट्रवादी पक्षाला मोठा हादरा ,राष्ट्रवादी पक्षात अलबेल कारभार कोणाचे कोणाला ताळमेळ लागेना..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपुरात राष्ट्रवादीला मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचे कट्टर समर्थक व पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ,बडा घर पोकळ वासा असणारे विजयसिंह देशमुख यांनी भाजपची वाट धरली आहे.देशमुख यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना विजयसिंह देशमुख हे भाजपच्या वळचणीला गेल्याने पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दिवंगत भारत भालके यांनी सलग तीन वेळा पंढरपूरचे प्रतिनिधित्व केले. २२ वर्ष त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना परिवार एक संघ ठेवला. मात्र त्यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराला घरघर लागली. यातच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिचारकांसोबत लढण्याचे जाहीर केले. त्या वक्तव्याचे पडसाद आता पंढरपुरच्या राजकारणात उमटू लागले आहेत. दिवंगत भारत भालके यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. भगीरथ भालके यांच्या त्या वक्तव्यावरून विठ्ठल परिवारात फूट पडल्याचे समोर आली आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालकेंचा निसटता पराभव झाला होता. भाजपने परिचारक अवताडे गटांना एकत्र आणत विजयश्री खेचून आणली. दरम्यान परिचारक आणि अवताडे यांच्यातील वाद वाढू लागला आहे. यातून आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यात आपल्या गटाचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख हे आवताडेंच्या गळाला लागले आहेत.
मंगळवेढ्याच्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक आणि भालके गट एकत्र येत समविचारी आघाडी स्थापन केली. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या सह त्यांच्या पॅनलचा धुवा उडाला. दामाजी कारखाना निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे समविचारी आघाडीचे मनोबल वाढले.
त्यातच काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्यात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके एकत्र आले होते. यावेळी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी आघाडी एकत्र लढणार असल्याचेही भालके यांनी जाहीर केले. त्यामुळे परिचारक आणि भालके एकत्र आल्याने काहींच्या पोटात पोटशुळ उठला असल्याची टिका आमदार आवताडे यांच्यावर केली होती. त्याचा वचपा म्हणून आमदार आवताडे यांनी भालके यांचे कट्टर समर्थक विजयसिंह देशमुख यांनाच आपल्या गटात घेतल्याचे बोलले जात आहे.
विठ्ठल परिवारच परिचारकांना तोड देऊ शकतो असे या मतदारसंघाचे राजकीय समीकरण सांगते. पण परिवाराच्या माणसानेच परिचारकांबरोबर आघाडी केल्याने विठ्ठल परिवारात मोठी अस्वस्थता आहे. आजी-माजी नगरसेवकांसह, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, भालके समर्थक, परिचारक विरोधकांनी नवा पर्याय शोधण्याचे काम सुरू केले. संजय बंदपट्टे यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला. तर काही पदाधिकारी आमदार समाधान आवताडे आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.
हे सर्व पाहता भगीरथ भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवाराला मात्र घरघर लागली आहे. त्यातच विजयसिंह देशमुख यांनीही त्याची प्रचिती दाखवून दिली आहे. त्यामुळे आता हे डॅमेज कंट्रोल भगीरथ भालके कसे हाताळणार, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.