उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न, औरंगाबादचं साळुंके दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी...
____________________________________________________
पंढरपूर प्रतिनिधी : आज कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. त्याचबरोबर गेली ५० वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गेली ५० वर्ष ते पंढरपूरची वारी करत आहेत.
◼️ 'मंदिर 2023' डायरीचे प्रकशन
शासकीय महापुरजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर २०२३' डायरी चे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचेही प्रकाशन झाले. दरम्यान, रात्री बारा वाजता विठुरायाच्या नित्यपूजेस सुरुवात झाली. यानंतर देवाची पाद्यपूजा करण्यात आली. या पूजेवेळी रात्री १२ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर दर्शन सुरु करण्यात आले.
◼️ पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला झेंडा
संत नामदेव महाराजांनी अवघ्या विश्वाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी पंढरपूर ते घुमान निघालेल्या सायकल वारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. ७५ वर्षाच्या भावे आज्जी देखील या सायकल वारीत सहभागी होणार आहेत. त्या २ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही सायकल वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील स्नेह वाढवणारा ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज पहाटे या सायकल वारीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झेंडा दाखवल्यावर सुरुवात झाली.
या सायकल वारीसाठी १०५ सायकलस्वार सहभागी झाले आहेत. यात ९० जेष्ठ नागरिक असलेले सायकल स्वार तर १६५ महिला सायकल स्वार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ७५ वर्षाच्या भावे आज्जी देखील सहभागी झाल्या आहेत. सलग २२ दिवसाची ही वारी घुमानमध्ये पोहोचल्यानंतर पंजाबचे राज्यपाल या वारकऱ्यांचे स्वागत करणार आहेत.