कार्तिकी एकादशी: पायी निघालेल्या दिंडीतील भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले, ७ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू !
____________________________________________________
मुख्यमंत्र्याकडून मृत्यू झालेल्या भाविकास प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर!
____________________________________________________
पंढरपूर; ( दै पंढरी नगरी न्युज ) : कार्तिकी यात्रेसाठी निघेलेल्या वारीत भरधाव गाडी घुसल्याने ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.
मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील आहेत.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांसोबत हा अपघात घडला. ५ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सांगोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कार्तिक यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातल्या जठारवाडी येथील वारकरी पायी पंढरपूर कडे निघाले होते. ४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे त्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक पंढरपूरला येतात.
सायंकाळी सातच्या दरम्यान दिंडी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ पोहोचली होती आणि त्याचवेळी मिरज पंढरपूर मार्गावर मिरजेकडून येणार एका भरधाव गाडी त्या दिंडीमध्ये मागून येऊन घुसली.
आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. मृतांमध्ये ५ महिला, २ पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तर काहीजण हे गंभीर जखमी झाले आहेत या दिंडीमध्ये ३२ जण विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.
या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या कार चालकाला सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील आहे.
अपघातातील मृतांची नावे - शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव,गौरव पवार,सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव.
▪️ मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच, या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.