मोहोळ तालुक्यातील नागरिकांचे संसार उध्वस्त न करता उभे करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले - माजी आमदार राजन पाटील

मोहोळ तालुक्यातील नागरिकांचे संसार उध्वस्त न करता उभे करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले - माजी आमदार राजन पाटील

------------------------------------------------------------------------------------

मोहोळ;(दै.पंढरी नगरी न्यूज) : नुकत्याच झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांनी आम्हाला टिका बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलांना 'बाळा' नावाने बोलून सभेतून सुख घेण्याची पायळी ओलांडली. ते सहन न झाल्यामुळेच केवळ त्यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठीच मी बोललो. मात्र याचा विपर्यास  केला जात आहे. आम्ही लोकांचे संसार उध्वस्त न करता उभे करण्यासाठी आयुष्य वेचत आहोत, सहाजिकच आम्ही समाजकारणाला प्राधान्य देणारे पाटील आहोत. हे केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तालुक्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तरीपण माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. असे सांगून आमचे चारित्र्य कोणीही बोलून राजकीय भांडवल करू नये असे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे.

भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकित झालेल्या आरोप-प्रत्यारोपावर आपली भूमिका स्पष्ट करताना माजी आमदार पाटील पुढे म्हणाले, भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमच्याकडे लोक आले होते पण एखादी जागा घ्या, असे सांगून आमचा अपमानच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांसाठी भीमाची निवडणूक लढणे गरजेचेच होते,आणि आम्ही ती लढलो. सभासद बांधवानी निवडणूकीत दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने मान्य केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २हजार मतदार बोगसपध्दतीने वाढविले, ती न्यायप्रविष्ठ बाब आहे. त्याबाबतचा निकाल निवडणूकीपूर्वी झाला असता तर आमची मते वाढली असती. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही.

निवडणूक प्रचारात आमच्या मुलांना विरोधकांनी सातत्याने बाळ... बाळ... असे बोलून आमच्यावर तोंडसुख घेतले गेले. केवळ त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मी बोलून गेलो. त्यानंतर मात्र आमच्या विरोधकांकडून आमच्या चारित्र्याविषयीची अफवा पसरविली जात आहे. आम्ही काय आहोत? आणि आमचे चारित्र्य कसे आहे ? हे संपूर्ण मोहोळ तालुक्याला माहित आहे. यापूर्वी माझे थोरले सुपूत्र  बाळराजे पाटील यांना विरोधकांनी खुनाच्या गुन्ह्यात गोवले होते. पण न्यायदेवतेने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आमचा परिवाराला त्या प्रकरणात नाहक त्रास सहन करावा लागला. आमची राज्यभरात मानहानी झाली. विरोधकांकडून सातत्याने आम्हाला बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरु असते, पण मोहोळ तालुक्यातील जनतेने अशा प्रवृत्तींना कधीही थारा दिला नाही. आमच्या कुटूंबावर सातत्याने विश्वास दाखविला आहे. आम्हीदेखील जनतेच्या विश्वासाला प्रामाणिकपणे पात्र राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आमदार म्हणून काम करताना संपूर्ण तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले. बाळराजे आणि अजिंक्यराणा ही माझी दोन्ही मुले सुसंस्कृत आहेत. ते विविध पदांवर काम करतात. राजकारणापेक्षा समाजकारणाला ते नेहमीच प्राधान्य देतात. दिवसभर माझे आणि माझ्या मुलांकडून समाजकारणाचे काम होते. हे संबंध मोहोळ तालुक्याला माहित आहे.

विश्वास, प्रामाणिकपणा आणि सुसंकृतपणामुळेच तालुक्याचे प्रेम स्व. बाबुराव आण्णा पाटील यांचे आदर्श विचार घेऊन आम्ही सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांप्रती प्रेमाची भावना ठेवून काम करीत आहोत. आम्हाला मोहोळ तालुक्यातील जनतेने नेहमी स्वतःच्या कुटूंबातील सदस्य मानले आहे. आम्हीही प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होत असतो. आम्ही जनतेसोबत प्रामाणिपणे, विश्वासाने आणि सुसंस्कृतपणे आदराने वागतो. त्यामुळे तालुक्यातील जनता आमच्यावर निखळ प्रेम करते. मागील दोन विधानसभा निवडणूकीत जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून नवख्या उमेदवारांना निवडून दिले. यातूनच मोहोळ तालुक्यातील जनतेचा आमच्यावर किती गाढ विश्वास आहे. हे स्पष्ट होते.