सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध दाखल्यांच्या वाटपाने सेवा पंधरवड्याची सांगता ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या प्रशासनाला सूचना..

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध दाखल्यांच्या वाटपाने सेवा पंधरवड्याची सांगता ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या प्रशासनाला सूचना..

*****************************************************
पंढरपूर; (प्रतिनिधी) : सेवा पंधरवड्यामध्ये सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. त्यामध्ये काही विभागांनी एकही प्रलंबित प्रकरण ठेवलेले नाही. उर्वरित विभागानी प्राप्त प्रकरणाचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात सेवा पंधरवडा सांगता समारोप, महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमप्रसंगी श्री  शंभरकर बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सामान्य शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी, संजय गांधी योजनेच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्यासह आरोग्य, पोलीस, महसूल विभाग, महावितरण विभाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी , कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील प्राप्त प्रकरणे ज्या दिवशी प्राप्त होतील त्या दिवसापासूनच त्यावर कार्यवाही सुरू करावी, असे केल्यास कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही. प्रशासन आपले आहे, असे नागरिकांना वाटावे, असे काम करा.  लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी प्रयत्न करा.

यावेळी श्रीमती पवार यांनी सेवा पंधरवड्यात प्रलंबित प्रकरणांविषयी केलेल्या कार्यवाहीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच शासनाच्या किती सेवा नागरिक विनासायास ऑनलाईन यंत्रणेव्दारे घेऊ शकतात याबद्दलची माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना 7/12 उतारे, संजय गांधी योजना, शिधापत्रिका, अपंगत्व प्रमाणपत्र, भूमिहीन दाखला, कंत्राटी कामगार लायसन्स तसेच मोहोळ, दुधनी, अक्कलकोट, मंगळवेढा नगरपरिषदमार्फत मिळणारे बांधकाम परवाने, पंतप्रधान आवास योजनेचे धनादेश, ई सेवा केंद्रामार्फत मिळणारे विविध दाखले, इत्यादींचे वाटप जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन अव्वल कारकून अमर भिंगे यांनी केले तर आभार तहसिलदार अंजली कुलकर्णी यांनी मानले.

या कार्यक्रमापूर्वी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.