मंगळवेढा शहरात भर दिवसा पाच लाख रुपये चोरटयांनी पळविले...त्या चोरीचा तपास लावणे पोलिसांना एक आव्हान
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा(दै.पंढरी नगरी न्यूज) :- मंगळवेढा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाने पाच लाख रुपये काढून मोटर सायकलच्या डिकीत ठेवलेले ते पैसे चोरटयाने भरदिवसा हातोहात पळविल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून चोरटयाचा शोध घेणे पोलिसांना एक आव्हान ठरले आहे. दरम्यान अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी सुहास गंगाराम कांबळे (रा.सप्तश्रृंगीनगर,मंगळवेढा) यांनी दि.1 जुलै रोजी 12.30 वा. जत जि.सांगली येथे नवीन घर खरेदी करण्यासाठी पैसे लागणार असल्याने फिर्यादी हे मोटर सायकल क्र.एम एच 13, बी.आर.8227 वरून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेले होते. बँकेतून चेकव्दारे पाच लाख रुपये काढून मोजून कापडी पिशवीत ठेवले. व ती पिशवी मोटर सायकलच्या डिकीत ठेवून लॉक केले होते.दुपारी 1.00 वा. घरी जात असताना शहरातील कल्याणप्रभू चौकात असलेल्या जयभवानी अॅटोमोबाईल दुकानासमोर मोटर सायकल थांबवून मोटर सायकलचे इंडिकेटर तुटल्याने ते घेण्यासाठी अॅटोमोबाईल दुकानात गेले. इंडिकेटर खरेदी करून पुन्हा मोटर सायकलजवळ येवून डिकीत इंडिकेटर ठेवत असताना पैशाची कापडी पिशवी फिर्यादीस दिसली नाही. त्यावेळी फिर्यादीने आजूबाजूला पिशवी पडली आहे का याचा सर्वत्र शोध घेतला. तसेच बँकेत जावून कर्मचारी यांना डिकीतून कोणीतरी पैशाची पिशवी चोरून नेली आहे असे सांगितले. घडलेल्या प्रकाराने फिर्यादी हे व्यतीथ झाल्याने काही सुचत नसल्याने तब्येत ढासळली. व आज रोजी विलंबाने घटनेची तक्रार देत असल्याचे फिर्यादीत नमून केले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, शहरातील कल्याण प्रभू चौक हा नेहमी वर्दळीचा असून भरदिवसा डिकीतील पाच लाख रुपये चोरटयांनी हातोहात लंपास केल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागील चार दिवसापुर्वी वेल्डींग दुकानासमोर याच चौकात लावलेली मोटर सायकल मालकाच्या डोळयादेखत पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. त्याचाही तपास अदयाप लागला नसताना पाच लाखाची रोकड चोरटयाने पळविल्याने चोरटे शिरजोर झाल्याची चर्चा होत आहे.सध्या मंगळवेढयात क्राईमचा आलेख वाढत चालला असून यावर पोलिसांनी वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अन्यथा सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे मुश्किल होणार असल्याची सुज्ञ नागरिकांतून चर्चा आहे.दोन्ही घटनेतील चोरटे सी सी टिव्ही कॅमेरात कैद झाले असून पोलिसांना ते शोधण्यात कितपत यश येते हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. सध्या गुन्हेगारीचे प्रमाण का वाढत आहे याचाही पोलिसांनी मूळाशी जावून शोध घेणे गरजेचे आहे.