विठ्ठलचे ,चेअरमन अभिजीत पाटील आमदारकीसाठी वापरणार स्व.माजी.आ. भारत भालके पॅटर्न
------------------------------------------------------------------------------------
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची केली तज्ञ संचालक पदी निवड,कारण बेरजेचे राजकारण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : नेहमी साखर कारखानदारांच्या विरोधी अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आता साखरेची गोडी लागली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात निमंत्रित संचालक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल आणि पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.एकाच वेळी स्वाभिमानीच्या दोन पदाधिकाऱ्यांना संचालक मंडळात संधी मिळाल्याने याची पंढरपूर तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.
अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणुकीमध्ये स्वाभिमानीने अभिजीत पाटील यांना पाठिंबा देत जाहीर प्रचार केला होता. त्याची उतराई म्हणून अभिजीत पाटील यांनी स्वाभिमानीचे तानाजी बागल आणि सचिन पाटील यांची निमंत्रीत संचालक म्हणून निवड केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या या निवडीमुळे स्वाभिमानीचा पहिल्यांदाच राज्याच्या साखर कारखानदारीत शिरकाव झाला आहे.
विठ्ठल कारखाना जिंकल्यानंतर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आतापासूनच त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघात साखर पेरणीही सुरु केली आहे. मंगळवेढा तालुक्यातही त्यांनी आपला संपर्क वाढवला आहे. अलीकडेच मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लतीफ तांबोळी यांच्या मुलीच्या विवाहासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आले होते. शरद पवार यांच्या दौऱ्याची सर्व जबाबदारी अभिजीत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. अभिजीत पाटील यांच्या आग्रहामुळेच शरद पवार माझ्या मुलीच्या लग्नाला आले, असे लतीफ तांबोळी यांनी जाहीरपणे सांगत पाटील यांची त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. याचाही चर्चा सध्या मंगळवेढ्यात सुरु आहे. यावरून पाटील यांनी मंगळवेढ्यात शिरकाव केल्याचे अधोरेखीत झाले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर नवीन आठ जणांना निमंत्रीत संचालक म्हणून घेतले आहे. त्यामध्ये स्वाभिमानीच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील चळे येथील उमेश मोरे ,गणेश ननवरे ,धनाजी खरात ,समाधान गाजरे ,अंगत चिखलकर या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही त्यांनी या निमित्ताने संधी दिली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीचा प्रभाव आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीची राज्यपातळीवर युतीदेखील आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची फौज अभिजित पाटलांच्या मागे उभे राहणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
स्वाभिमानीला जवळ करुन अभिजीत पाटील यांनी विरोधी भालके-परिचारक आणि आमदार आवताडे यांना एक प्रकारे शह दिल्याचे मानले जाते. आगामी काळात पाटील आणखी कोणती नवी खेळी खेळतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
---------------------------------------------------------------------------------स्वाभिमानीचा पहिला आमदार 'विठ्ठल'चा अध्यक्ष --------------------------------------------------------------------------------
विठ्ठल कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष असलेले भारत भालके यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळवला होता. माळशिरस विधानसभा मतदार राखीव झाल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपूरमधून उमेदवारी दिली. त्यावेळी सुधाकर परिचारकांना डावल्याचा रोष येथील मतदारांमध्ये होता. दुसरीकडे त्यांच्या विरोधात विठ्ठल कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष भारत भालके यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून 'रिडालोस'ने मैदानात उतरवले होते. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीमध्ये भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोठ्या मताधिक्यांनी धक्कादायक पराभव केला होता. भारत भालके यांनी पंढरपूरमधून सलग तीन वेळा वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवून विजयाची हॅटट्रीक केली होती.
-----------------------------------------------------------------------------------
अभिजित पाटलांचे भालकेंच्या पावलावर पाऊल
-----------------------------------------------------------------------------------
कोरोना काळात आमदार भारत भालके यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना संधी मिळवता आली नाही. पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले. आमदार आवताडे यांनी २०२४ साठी पुन्हा दंड थोपटले आहेत. भगीरथ भालके यांचा विठ्ठल कारखाना ताब्यातून गेल्याने विधानसभेच्या उमेदवारीचा दावाही कुमकुवत झाला आहे. दुसरीकडे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी (स्व.) आमदार भारत भालकेंच्या पावलावर पाऊल टाकत बेरजेचे राजकारण सुरु केले आहे.