कृषी आयुक्तांचा दांडी बहाद्दरांना इशारा..!
---------------------------------------------------------------------------------
तुकाराम मुंढे पॅटर्न वापरणार*
---------------------------------------------------------------------------------
पुणे (दै.पंढरी नगरी न्यूज) : नवे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपल्या धडाकेबाज कारभाराची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी विविध विभागांना भेटी दिल्या असता काही कार्यालये अस्वच्छ दिसली.तसेच, अनेक दांडी बहाद्दरदेखील आढळले. "यापुढे प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याने वेळेत कामावर यावे, आपापली कार्यालये स्वच्छ ठेवत कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, अनावश्यक वस्तूंना तत्काळ बाजूला करा," असे स्पष्ट आदेश या वेळी आयुक्तांनी दिले.
कृषी आयुक्तालयात एरवी प्रत्येक आयुक्त स्वतःच्या आलिशान कार्यालयात बसून सर्व विभागांचा आढावा घेत असतो. मात्र, स्वतःच्या खुर्चीतून उठून विविध कार्यालयांना अचानक भेटी देत सूचना देण्याचे धाडस यापूर्वीच्या आयुक्तांकडून क्वचितच दाखवले गेले आहे. त्यामुळे आयुक्तालयातील अनेक विभागांच्या कोपऱ्यांमध्ये धुळ साचते. दस्तावेजांची व्यवस्था न लावल्याने फायलींचे ढीग दिसतात. मोडक्या खुर्च्या व अनावश्यक सामुग्रींनी काही भाग भरलेले दिसतात. यात कृषी भवन इमारतींमधील कार्यालयांचा समावेश होतो.
तुंबलेली स्वच्छतागृहे, प्रयोगशाळांमध्ये काचेच्या बाटल्यांचा खच, कार्यालयांच्या भिंतीवर कोळ्याची जाळे तर रंग उडलेल्या भिंती, पंखे चालू आणि कर्मचारी गायब झालेले असेही दृष्य काही कार्यालयांमध्ये दिसत असते. या उलट सतत वरिष्ठांच्या संपर्कात असलेली काही कार्यालये नीटनेटकी, आलिशान फर्निचर असलेली आणि गजबजलेली आहेत.
सलग दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (ता.१२) आयुक्तालय उघडले. त्या वेळी नवे आयुक्त चव्हाण यांनी मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयांना भेटी दिल्या."कृषी आयुक्तालयात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ९.४५ वाजता हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, आयुक्तांना साडेदहानंतरदेखील अनेक खुर्च्या रिकाम्या दिसल्या. त्यामुळे आयुक्त चकित झाले. त्यांनी कार्यालयांची बारकाईने पाहणी करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी जुन्या फायली पडून होत्या. जुने संगणक साहित्य, खोकी, जुनी टंकलेखन यंत्रे तसेच वापराविना अनेक वस्तू पडून असल्याच्या दिसल्या. त्यामुळे आयुक्तांनी सर्व कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले," अशी माहिती एका संचालकाने दिली.
देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे दोघेही स्वच्छ भारत अभियानाची सतत माहिती देत आहेत. मात्र, आपण स्वतः सरकारी अधिकारी असूनदेखील आपली कार्यालये का स्वच्छ ठेवू शकत नाही, असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला. "आपण काम करीत असलेले ठिकाण, तेथील कपाटे आणि आजूबाजूचा परिसरदेखील अस्वच्छ असणे ही योग्य बाब नाही. यापुढे प्रत्येक कर्मचाऱ्याने सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात हजर राहावे. या आदेशाचे कटाक्षाने पालन करावे," अशी तंबी आयुक्तांनी दिली.
◼️ 'दस्तावेजांची निंदणी करा'
कृषी आयुक्तालयात कागदपत्रांचे अक्षरक्षः तण माजले आहे. कागदपत्रे व्यवस्थित न लावल्यामुळे कामकाजावरही परिणाम होतो. त्यामुळे आयुक्तांनी सर्व कार्यालयांना आपापल्या कार्यासनाची संबंधित कागदपत्रांचे निंदणीकरण (विडिंग) करावे, असे आदेश दिले आहेत. "आवश्यक सर्व कागदपत्रे रेकॉर्ड रुममध्ये ठेवावी. विनावापर साहित्याची विल्हेवाट लावावी," असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.